Sharad Pawar On George Fernandes : देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी आणीबाणीला कठोर विरोध केला होता. याच काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. आज आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला 50 वर्षे झाले. दरम्यान, आज शरद पवार यांनी दादरमध्ये कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात कामगार नेते असलेल्या याच जॉर्ज फर्नांडिस यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या.




जॉर्ज फर्नांडिस हे गमतीदार व्यक्तीमत्त्व होतं


आज आपण एका वादळी व्यक्तीमत्त्वाचं स्मरण आपण करत आहोत. आजचा दिवस 25 जून. स्वातंत्र्यानंतर मूलभूत लोकशाहीच्या अधिकाराच्या दृष्टीने या देशात एक मोठं संकट लोकांनी पाहिलं तो हा दिवस आहे. देशातील इतिहासाचा हा दुर्देवी दिवस आहे. या दुर्देवी दिवसातही चित्र बदलण्यासाठी लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी काम केलं. त्यात जॉर्ज फर्नांडिस यांचा उल्लेख करावा लागतो. जॉर्ज फर्नांडिस हे गमतीदार व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचा जन्म बंगळुरूचा. ते आले मुंबईत. त्यांना मुंबईत घरदार नव्हतं. ते कुठेही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपायचे. अत्यंत हलाकीच्या स्थितीत जॉर्ज यांचा सुरुवातीचा काळ गेला, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.




बरोबर कामाचे कागद किंवा कुठलं तरी पुस्तक असायचं


तसेच, एक गोष्ट मात्र त्यांनी केली. कष्टकरी माणसाच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचं सूत्र जॉर्ज साहेबांनी आत्मसात केलं. आम्ही भेटायचो. चर्चा करायचो. त्यांच्याशी बोलताना मोठी गंमत वाटायची. कसलीही शैक्षणिक, सांपत्तिक पार्श्वभूमी नसताना हे व्यक्तीमत्त्व असं होतं की अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्त्व होतं. त्यांची मूळ भाषा कोकणी. कानडी, ऊर्दु, मराठी, हिंदी, इंग्रजी त्यांना येत होती. त्या काळात मी केंद्रीय पातळीवर दोनच नेते पाहिले ज्यांचे देशातील अनेक भाषांवर प्रभुत्त्व होतं, एक नरसिंह राव आणि दुसरे जॉर्ज फर्नांडिस, असं शरद पवार म्हणाले.
जॉर्ज यांचं घर म्हणजे पुस्तकांचं घर होतं. कधीही तिथे गेले तरी जी जागा असेल त्या ठिकाणी कोणतं तरी पुस्तक असायचं. अनेकदा जॉर्ज दिल्लीला निघायचे. त्यांची नेहमी शेवटची फ्लाईट असायची. आणि शेवटच्या फ्लाइटमध्ये बसायचे. केंद्रात मंत्री असायचे तेव्हा शेवटची सीट त्यांची असायची. कधी क्लास वनच्या शीटवर जॉर्ज यांना बसलेलं मी पाहिलं नाही. शेवटच्या सीटवर बसायचे. बरोबर कामाचे कागद किंवा कुठलं तरी पुस्तक असायचं. दिवसाचा काही मिनिटाचा कालखंडही वाया जाऊ द्यायचा नाही हे त्यांचं सूत्र होतं. त्यांची राजकीय दृष्ट्या वैचारिक स्पष्टता होती. कारण लोहिया, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण अशा थोर देश सेवकांच्या विचाराचे पाईक म्हणून त्यांनी आयुष्य घालवलं, अशी स्तुतीसुमनं त्यांनी उधळली.




बॉम्बे लेबर को ऑपरेटिव्ह बँक उभी केली


मुंबईत आल्यावर जॉर्ज फर्नांडिस रणजीत भानूंच्या घरी यायचे. इथे आल्यावर त्यांनी मुंबईतीला जो कष्टकरी आहे, त्याच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचं सूत्र असल्याची भूमिका पाळली. आज त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान आपण केला. त्या सन्मानात या सहकाऱ्यांनी जॉर्जला आणि कामगारांना प्रचंड साथ दिली, असेही शरद पवार म्हणाले.  जॉर्ज यांनी नेहमी विधायक काम केलं. त्यांनी बॉम्बे लेबर को ऑपरेटिव्ह बँक उभी केली. ही बँक यशस्वी झाली. ती बँक कामगारांच्या हिताची ठरली. या बँकेचा लाभ शहरातील आणि आजूबाजूच्या कष्टकरी लोकांनी घेतला. त्याचं श्रेय जॉर्ज यांना जातं, असं शरद पवार यांनी सांगितलं.


बडोदा डायनामाइट केसमध्ये सहभागी झाले


आणीबाणीचा कालखंड जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनातील कठीण आणि कठोर कालखंड होता. या काळात ते भूमिगत झाले होते. बडोदा डायनामाइट केसमध्ये सहभागी झाले. त्यासाठी लागणारे साधनं जमा केली. त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना यातना सहन कराव्या लागतील अशी स्थिती त्याकाळी झाली होती. त्यावेळच्या सरकारने त्यांची भूमिका मांडली नाही. जॉर्ज सारखे अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात होते. या सर्वांनी देशातील लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड त्याग केला. त्यात जॉर्जचा सहभाग विसरता येणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.


…अन् माझ्या नेतृत्वात 1978 साली सरकार स्थापन झालं


पुढे त्यांनी आणीबाणीवरही भाष्य केलं. आणीबाणीचा कालखंड वेगळा होता. मी नुकताच महाराष्ट्रात विधीमंडळात आलो होतो. आम्ही काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेला मोठा वर्ग होता. त्यात आम्हीही होतो. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला. काँग्रेस पक्षात आम्ही वेगळा सवतासुभा मांडला. काँग्रेसचे दोन पक्ष झाले. इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस एस होता. आम्ही काँग्रेस एसमध्ये होतो. निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही. निवडणुकीत एका बाजूला जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस एस आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस आय अशी स्थिती होती. काँग्रेस आय आणि काँग्रेस एसने मिळून सरकार बनवलं. मी त्या सरकारमध्ये होतो. आम्ही अस्वस्थ होतो. आम्हाला काँग्रेसच्या आयबरोबर जायला मानसिकता नव्हती. शेवटी जॉर्ज असतील, चंद्रशेखर असतील आणि मधु दंडवते असतील आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आणि ते सरकार बदललं. माझ्या नेतृत्वात 1978 साली सरकार स्थापन झालं. आणीबाणीचा पुरस्कार न करणारं सरकार स्थापन झालं. या सरकार स्थापनेत जॉर्ज यांचा मोठं योगदान होतं, अशी महत्त्वाची माहिती शरद पवार यांनी दिली.


स का पाटील यांना कसं पराभूत केलं?


त्या कालखंडात जॉर्ज प्रचंड लोकप्रिय होते. संघर्षशील नेते होते. रेल्वे बंद करायची असेल, मुंबई बंद करायची असेल तर ती धमक आणि ताकद या राज्यात एकाच नेत्यात होती. त्याचं नाव जॉर्ज फर्नांडिस असं होतं. त्यांना लोकांची प्रचंड मान्यता होती. नुकत्याच निवडणुका आल्या होत्या. मुंबईचे अनभिषिक्त राजे एस के पाटील म्हणजेच स.का. पाटील हे होते. त्यांचं मुंबईवर प्रचंड नियंत्रण होतं. काँग्रेसची संघटनात्मक शक्ती त्यांच्या मुठीत होती. पाटील साहेब सांगतील तो माणूस निवडून यायचा. पण कष्टकऱ्यांना हे नेतृत्व मान्य नव्हतं. निवडणुकीत त्यांचा पराभव करणं अशक्य होतं. त्याकाळात जॉर्जने पाटील साहेबांच्या विरोधात लढायचं ठरवलं. त्यांनी गंमतीदार प्रचार केला. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर लावली. यू कॅन डिफिट पाटील, तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता, असं त्या पोस्टर्सवर लिहिलं होतं. सामान्य माणसाचा लोकशाहीचा मूलभूत अधिकार जागरूक करण्याचं काम जॉर्ज फर्नांडिस यांनी केले. एस के पाटील सेक्युलर नेते होते. त्यांचा पराभव झाला. तो जॉर्ज यांनी केला, अशी जुनी आठवण शरद पवार यांनी सांगितली.


कोकण रेल्वेचा जन्म कसा झाला?


कोकण रेल्वेसाठी जॉर्ज यांनी बैठक बोलावली होती. मला बोलावलं होतंय मधु दंडवते यांना बोलावलं होतं. कर्नाटक आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना, केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. काही झालं तरी रेल्वे करायची आहे. पैशाची कमतरता आहे. इतके पैसे घालू शकत नाही. वेगळी पॉलिसी करावी. नवीन संस्था सुरू करूया. सर्वांनी गुंतवणूक करूया. बाजारात पैसे उभे करू. कोकण रेल्वे सुरू करू. चर्चा झाली. सर्व हो म्हणाले. पैशाचा प्रश्न आला. जॉर्जने सांगितलं 50 टक्के रक्कम केंद्र सरकार देईल. बाकीची राज्यांनी द्यायची. गोव्याने सांगितलं आम्हाला झेपणार नाही. केरळने सांगितलं इच्छा आहे पण आर्थिक स्थिती ठिक नाही. कुठून तरी पैसे द्या. आम्ही नंतर देऊ. तेव्हा जॉर्जनी मला बाजूला घेतलं आणि सांगितलं काहीही करून आपल्याला हे करायचं आहे. ही दोन छोटी राज्यं आहेत, ती गुंतवणूक करू शकत नाहीत. आता त्यांच्या वतीने महाराष्ट्राने गुंतवणूक करावी. नंतर महाराष्ट्राचे पैसे देण्याचं काम कोकण रेल्वे करेल. बाकीचे पैसे केंद्राकडून मिळाले. आज कोकण रेल्वे अस्तित्वात आली. त्याचं श्रेय जॉर्ज आणि मधु दंडवते यांना द्यावंच लागेल. आम्हाला लाभ होता. त्यामुळे लाभधारकांनी श्रेय घ्यायचं नाही. संस्था उभी करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जॉर्जने महत्त्वाचं योगदान दिलं होतं, असं म्हणत जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेसाठी नेमकं काय केलं? याची सविस्तर माहिती दिली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.