पुणे : तांत्रिक अडचणींमुळे गेली तीन वर्षे बंद असलेले शहरातील समाजकल्याण विभागाचे वसतिगृह अखेर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. याविषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल घेऊन समाजकल्याण विभागाने हे वसतिगृह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले आहे. यामुळे सुरक्षित निवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या सहायक आयुक्तांच्या कार्यालयाजवळ २०२१ मध्ये ५०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची पाच मजली वसतिगृहाची इमारत उभारण्यात आली होती. मात्र, समाजकल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे तसेच महापालिकेचे पूर्णत्व प्रमाणपत्र (ओसी) न मिळाल्याने हे वसतिगृह गेल्या तीन वर्षांपासून बंद होते. याचा फटका वंचित घटकातील विद्यार्थ्यांना बसत होता. ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करत या विषयाला वाचा फोडली होती. याची दखल घेत २५० मुले आणि २५० मुलींसाठी आता हे वसतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहामुळे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय झाली असून त्यांना सुरक्षित व पोषक वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.


याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता सूरज मोरे म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी पुण्यात शिकत आहे आणि राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे खूप कठीण जात होते. वसतिगृह सुरू होणारच नाही असे वाटले होते, पण आता सुरक्षित आणि स्थिर निवास मिळाल्याने आम्ही खऱ्या अर्थाने शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतो. ‘सकाळ’ने आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी आभार मानतो.’’

या आहेत सुविधा

  • मोफत निवास मोफत भोजन प्रशस्त ग्रंथालय मैदान


  • सभागृह इंटरनेट सुविधा स्टेशनरी साहित्य अंथरूण-पांघरूण दरमहा खर्चासाठी प्रत्येकी ८०० रुपये निर्वाह भत्ता


  • स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी १०० रुपये



पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना राहण्याच्या आणि जेवणाच्या अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. हे वसतिगृह सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा हा गंभीर प्रश्न सुटणार आहे. प्रशासनाने आता भविष्यात असे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.


- राजरत्न बलखंडे, प्रमुख, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य


भाडेतत्वावर घर घेणे परवडत नव्हते. महिन्याला साधारण १० ते १२ हजार रुपये खर्च येत असे. आई-वडील हातमजुरी करतात, त्यामुळे एवढा खर्च करणे शक्य नव्हते. पण आता हे वसतिगृह सुरू झाल्याने आमचे मोठे ओझे हलके झाले आहे. या वसतिगृहात कमी खर्चात, सुरक्षित वातावरणात राहता येणार असल्यामुळे आम्ही आता अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित करू शकतो.


- प्रदीप घुले, विद्यार्थी


विश्रांतवाडी येथील वसतिगृहात सध्या सुमारे ११० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात २५० मुलं आणि २५० मुलींना प्रवेश देण्यात येणार असून, वसतिगृह पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याची आमची तयारी आहे.


- विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, पुणे

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.