आळंदी, ता. २० : पुणे-आळंदी या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर घाणपाणी वाहिनी तुंबल्यामुळे मैला युक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यावरून हे सांडपाणी वाहत असल्याने ये-जा करणारे दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना सांडपाण्याचा घाण वास सहन करावा लागत आहे. मात्र, ही तुंबलेली वाहिनी साफ केली जात नाही.
आळंदीला येणाऱ्या मार्गावरच घाणपाणी रस्त्यावरून वाहत आहे. मुख्यत्वे पुणे-आळंदी रस्त्यावरून सकाळच्या वेळेत हे पाणी अधिक प्रमाणात वाहते. मैला युक्त पाणी असल्याने चालणे जिकरीचे झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेजारून मोठी गाडी गेली की सर्व सांडपाणी पायी चालणाऱ्या तसेच दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांच्या अंगावर उडते.
पुणे-आळंदी रस्त्यावरून पुणे, येरवडा, विश्रांतवाडी, भोसरी भागातून अनेक कामगार वर्ग, विद्यार्थी आळंदीमध्ये येतात. त्याचबरोबर आळंदी नगरपरिषद हद्दीतील काळे कॉलनी भागात राहणारे नागरिक याच रस्त्यावरून ये-जा करतात. लहान मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी महिला जेव्हा बाहेर पडतात तेव्हा एखादी गाडी या पाण्यातून गेली की सर्व सांडपाणी त्या लहान विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते. विनाकारण भांडणे होण्याचे प्रकार घडत आहेत.
सहा महिन्यांपासून मुख्य रस्त्यावरून हे घाणपाणी वाहिनी तुंबल्यामुळे वाहते आहे. त्याकडे नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. या ड्रेनेज लाइन मधील दैनंदिन साफसफाई करताना कर्मचारी कधी दिसत नाहीत.
पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबत आहे. त्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली असून कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र अद्याप दुरुस्ती झालेली नाही.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.