नारायणगाव, ता.२३ : अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात जुन्नर तालुक्यातील द्राक्ष, सोयाबीन, भात या प्रमुख पिकासह इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेती पिकांच्या नुकसानीचे पाच कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान महसूल विभागाकडे नुकतेच जमा झाले आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.
तालुक्यातील एक हजार २४८ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे व दोन हजार २९४ .९५ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, भात या प्रमुख पिकासह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाच्या वतीने शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार अनुदान महसूल विभाग कडे नुकतेच जमा झाले आहे.
तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तृणधान्य,सोयाबीन, भात, भाजीपाला पिके व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे घड निर्मिती न झाल्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष या वार्षिक नगदी पिकांचे झाले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पंचनामा प्रक्रियेतून द्राक्ष पिकाला वगळण्यात आले होते. त्यामुळे इतर पिकांचे पंचनामे केले. मात्र द्राक्ष पिकाचे पंचनामे करण्यात आले नाही. बागांची पाहणी करून द्राक्ष पिकांचे पंचनामे करावेत.
अशी मागणी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी केली होती. या बाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. माजी आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली होती. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी द्राक्ष बागांची पाहणी करून द्राक्षाचे पंचनामे करावेत, असे आदेश पवार यांनी त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले होते. त्यानुसार १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात आले.
शेतकरी भावुक
महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक संदीप वारुळे, द्राक्ष उत्पादक विकास दरेकर, अवधूत बारवे, राजेश गावडे पाटील म्हणाले १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी आमदार बेनके, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या समवेत आम्ही पुणे येथे उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली होती. या वेळी त्यांनी द्राक्ष पिकांचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिल्यामुळेच द्राक्ष उत्पादकांना अनुदान मंजूर झाले आहे. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवणारे माजी उपमुख्यमंत्री पवार आज आपल्यात नाहीत. याचे मोठे दुःख आम्हाला झाले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.