हरिदास कड ः सकाळ वृत्तसेवा
चाकण, ता. २१ : चाकण औद्योगिक वसाहतीतील वाढत्या लोकसंख्येला हक्काची भाजी मंडई नसल्याने जुन्या पुणे- नाशिक महामार्गावरच धोकादायक बाजार भरत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
येथील लोकसंख्या पाच लाखांच्या पार गेली असली, तरी नियोजित मंडईअभावी विक्रेते माणिक चौक, नेहरू चौक आणि राक्षेवाडी फाटा परिसरात रस्त्यावरच पथारी मांडतात. अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि पथारीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी पथारी परिसरात पथदिवे नसल्याने अंधारातच व्यवहार चालतात, जे अपघातांना निमंत्रण देत आहेत.
शेतकरी आणि ग्राहकांसाठी ओटे, शेड किंवा वाहनतळाची कोणतीही सोय नाही. चाकण- तळेगाव आणि चाकण- शिक्रापूर रस्त्यावर होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासन केवळ तात्पुरती कारवाई करते, मात्र कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रस्ते अडवून बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांचे अपघात होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
अस्ताव्यस्त कचऱ्याचे ढीग
बाजार संपल्यानंतर पडलेला कचरा विक्रेते, पथारीवाले मुख्य चौकात अगदी रस्त्याच्या कडेला कोठेही टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. हे कचऱ्याचे ढीग नगरपरिषद प्रशासन, नाणेकरवाडी ग्रामपंचायत कधी उचलते तर कधी उचलत नाहीत. त्यामुळे कचऱ्याचे ढीग तसेच पडून राहतात. त्यामुळे नागरिकांच्या, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
प्रसाधनगृहांचा अभाव
बाजारात महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छ प्रसाधनगृहे नाहीत. माणिक चौकात आंबेठाण चौकात तसेच राक्षेवाडी फाटा, मार्केट परिसरात स्वच्छतागृह एकही नाही.तसेच, बाजारात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोयही नाही.
पावती आणि हप्ते वसुली
रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या पथारीवाले, विक्रेते, हातगाडीवाले यांच्याकडून चाकण नगरपरिषद, नाणेकरवाडी ग्रामपंचायतीकडून २० रुपये करवसुली केली जाते.
वजन मापे तपासणी
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वजन मापांची नियमित तपासणी होत नाही. काही पथारीवाले हात गाडीवाले, विक्रेते यांच्याकडे वजन मापे अगदी दगडाची असतात.
प्लॅस्टिक बंदी फक्त नावाला
बाजारात प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अनेक विक्रेते, हातगाडीवाले, पथारीवाले यांच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्रास ठेवल्या जातात. नगरपरिषद प्रशासनाकडून कधीतरी कारवाई केली जाते.
अनेक विक्रेत्यांत वाद
गुरुवारी आणि रविवारी बाजारात मोठी गर्दी असते. त्यावेळेस अनेकांचे मोबाईल व दागिने चोरीला जातात. तसेच महिला, तरुणीची छेडछाडीचे प्रकार होतात.
स्वतंत्र भाजी मंडई करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. योग्य ठिकाणी भाजी मंडई केली जाईल रस्त्यावरच्या बाजारामुळे अस्ताव्यस्तपणा येतो आहे हे मात्र खरे आहे.
- डॉ . अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद
10487
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.