राज्यात उष्णता कहर करत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वर्तवला. फक्त विदर्भच नाही तर मराठवाड्यातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यावर सध्या दुहेरी संकट बघायला मिळत आहे. वर्धा येथे काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली. काल वर्ध्यात 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अकोला, यवतमाळ आणि अमरावती येथे 45 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. आज अमरावती, अकोला, वर्धा, या जिल्ह्यांमध्ये सुर्य आग ओकताना दिसेल. हिंगोली, यवतमाळ, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांमध्येही उष्णतेही लाट असेल. कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. याठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.


यादरम्यानच प्रशासनाकडून नागरिकांकरिता अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी गेलाय. अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अकोल्यातील असदगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळला. जास्त प्रमाणात ऊन लागल्याने नाकफुटी होत रक्तस्त्राव झाला असावा, म्हणून या व्यक्तीचा कदाचित उष्माघातामुळे मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलाय.


वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे जिल्ह्यात सुरू असलेल्या डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल होताना दिसत आहेत. वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर सलग दुसऱ्या दिवशीही डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्या असून भर उन्हात शेतकरी कॅन रांगेत नंबर लावून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


नाशिक जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात आज तब्बल 42अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून गेल्या दीड महिन्यात सव्वीस दिवसांहुन अधिक 40 अंशांच्या पुढे तापमान कायम असल्याने उन्हाळी कांदा पिकावर गंभीर परिणाम होत आहे. राज्यात पुढील काही दिवसही उष्णता वाढण्याचे संकेत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.