शिवसेना ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उपस्थित रहावं यासाठी सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र या बैठकीला केवळ शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी तीनच खासदार उपस्थित होते. 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या 6 खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे, कुठलीही पूर्वसूचना न देता बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण या नोटीसमध्ये विचारण्यात आलं आहे. तसेच उत्तर देण्यासाठी या खासदारांना सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.


दरम्यान एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 


भास्कर जाधव साहेब यांच्या सारखा माणूस आमच्या मार्गदर्शनासाठी आला तर आम्हाला का नको? पण ते वाटेवर आहेत असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. उदय सामंत यांच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही कोणालाही टार्गेट केलं नाही. रोज प्रवेश होत आहेत, आमदार, खासदार पक्षात येत आहेत. संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर आमदारांवर पैसे घेतल्याचा आरोप केला होता, या आरोपाला देखील यावेळी मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 50 कोटी बोलायला लिहायला सोपे आहे, 50 खोके एकदम ओके म्हणाले काय झाले?  जेवढी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होणार,  तेवढे अधिक मत त्यांना मिळणार असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.