शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या संसदीय बैठकीस संबंधित खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. पक्षाच्या बैठकीनंतर सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या अधिकृत राजकीय निर्णयाची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे या खासदारांचा पुढील राजकीय प्रवास कोणत्या दिशेने होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, या घडामोडींवर प्रथमच प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आणखी दोन दिवस वाट पाहा, सर्व काही स्पष्ट होईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


याचवेळी ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांवर टीका करण्यात येत असताना, श्रीकांत शिंदे यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. “जे जास्त बोलतात, त्याचा फायदा आम्हालाच होतो,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर पलटवार केला.


दरम्यान, मंत्री योगेश कदम यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देताना संबंधित खासदार आमच्या विचारांशी जोडले जात असतील तर त्याचा पक्षाला फायदा होईल, असे म्हटले. तसेच त्यांच्या प्रवेशाबाबतची घोषणा लवकर व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.


राज्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे आगामी काही दिवस महत्त्वाचे ठरणार असून, सहा खासदारांच्या पुढील निर्णयाकडे आणि संभाव्य पक्षप्रवेशाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.