राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असल्याचे शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.


विशेष फेरी-१ नुसार ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांना आता संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ‘Proceed for Admission’ पर्यायाचा वापर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


सुधारित वेळापत्रकानुसार आता ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.


विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक )  डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.