भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ असून गल्लीबोलात या खेळ खेळला जातो. यावरून या खेळाची भारतातील लोकप्रियता अधोरेखित होते. पण उत्तर प्रदेशच्या भदोही गावात क्रिकेट सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना घडली. फलंदाजी करताना एका खेळाडूच्या हातून बॅट सटकली आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या डोक्याला लागली. या घटनेनंतर काही तासातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. स्टेशन हाउस ऑफिसर मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत खेळाडू त्याच गावातील राहणारा होता आणि फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण करत होता. बुधवारी संध्याकाळी भनीपूर गावात 10 ते 14 वयोगटीतील मुलं खेळत होती. तेव्हा 14 वर्षाच्या मुलाने बॉलवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या हातून बॅट सटकली आणि फिल्डिंग करणाऱ्या मुलाच्या डोक्याला लागली. या घटनेनंतर दुखापतग्रस्त मुलाला दुसऱ्या मुलांनी त्याला सांभाळलं आणि खेळ पुन्हा सुरू झाला. मग त्याच्या संघाची फलंदाजी आणि जखमी मुलगाही फलंदाजीला आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळून घरी परतल्यानंतर मुलाच्या डोक्याला तीव्र वेदना व्हायला लागल्या. यानंतर चक्कर येऊन तिथेच पडला. त्याला तात्काळ प्रयागराज जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कुटुंबिय पुण्याहून नातेवाईकांना भेटण्यासाठी तिथे आले होते. तसेच 10 जुलैला परतणार होते. मृत वडिलांच्या तक्रारीनंतर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय घडलं आणि कसा मृत्यू झाला याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूच्या डोक्याला बॉल किंवा बॅट लागल्यास थेट खेळ थांबवला जातो. संघाचे फिजिओ आणि डॉक्टर तातडीने मैदानावर धाव घेतात. खेळाडूची ‘कन्कशन टेस्ट’ करतात. खेळाडूला चक्कर येत असल्यास किंवा गोंधळल्यासारखे वाटल्यास त्याला ताबडतोब मैदाबाहेर नेले जाते. तसेच तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.