राज्यात लग्न न झालेल्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विवाहाचे वाढते वय, स्थळ जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण ही आता केवळ वैयक्तिक समस्या राहिलेली नसून गंभीर सामाजिक चिंतेची बाब बनत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 30 जून 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून तब्बल 29 तरुणांनी आत्महत्या केली आहे. याचाच अर्थ एका महिन्यात जवळपास 5 तरुणांनी जीवन संपवले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जळगाव जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण 443 आत्महत्यांची नोंद झाली असून त्यामध्ये 383 पुरुष, 29 महिला, 8 लहान मुले आणि 11 लहान मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सुमारे 90 टक्के इतके आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्येही कौटुंबिक तणाव, परीक्षेचे दडपण आणि प्रेमप्रकरणांमुळे आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत.
मनोविकारतज्ज्ञांच्या मते, मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींशी कुटुंबीयांनी मोकळा संवाद साधणे, त्यांना भावनिक आधार देणे गरजेचे गरज भासल्यास वेळेत समुपदेशन व उपचार उपलब्ध करून देणे, हे आत्महत्या रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. मात्र अनेकजण आपले मन मोकळे न करता टोकाचा निर्णय घेत असल्याचे समोर आले आहे. ही एक धक्कादायक बाब आहे.
महाराष्ट्रातील तरुणांचे लग्न न जमण्यामागे बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता, शेती क्षेत्रातील मंदी व लहरी हवामान, तसेच मुलींच्या व पालकांच्या उच्च व बदललेल्या अपेक्षा ही मुख्य कारणे आहेत. काही तरुणांकडे स्थिर उत्पन्नाचा मार्ग नाहीये त्यामुळे मुली अशा मुलांशी लग्न करण्यास तयार होत नाहीत.
राज्यातील अनेक तरूण हे शेती करतात, मात्र ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांना मुलगी देण्यास पालकांचा नकार असतो. अनेक पालकांना आणि मुलींना त्यांचा जोडीदार हा शहरातील असावा असं वाटतं. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी तरूणांची लग्ने होण्यास अडचण येत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.