मुंबई : आयएएस म्हणून काम करताना असे चार ते पाच प्रसंग आले की त्यामुळे हे आता सगळं सोडावं असा विचार आला. चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापासून ते जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला, असा धक्कादायक दावा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात ज्या महिलांकडून सत्कार करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आल्याची घटना तुकाराम मुंढे यांनी सांगितली. आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.
कारवाई जेवढी मोठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बदनाम करण्यासाठी सामूहिक कट रचला जातो. आपल्या बाबतीतही तसेच काही प्रसंग घडल्याचा किस्सा तुकाराम मुंढे यांनी शेअर केला. काही वेळा तर हे आता नको असंही वाटत होतं. पण आपल्या कामापासून प्रेरणा घेतली आणि पुन्हा नव्याने उभा राहिलो असं तुकाराम मुंढे म्हणाले.
तुकाराम मुंढे म्हणाले की, "सुरुवातीच्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण होतं. बार्शीला असताना अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढले. त्यावेळी कुणीतरी महिला मला भेटायला आल्या होत्या. त्या माझा सत्कार करण्यासाठी आल्या आहेत अशी माहिती देण्यात आली. पण माझा गार्ड माझ्याकडे आला आणि त्याने मला त्या महिलांना भेटू नका असं सांगितलं. गार्डने जर नाही म्हटलं तर तसंच करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या होत्या. त्यामुळे मी त्या महिलांची भेट नाकारली. दोन तासांनंतर मला डीवायएसपींचा फोन आला. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात काहीजण तक्रार दाखल करण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं.
तुकाराम मुंढे पुढे म्हणाले की, "त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की काही महिला आणि त्यांचे वकील पोलीस स्टेशनमध्ये आले असून तुमच्या विरोधात अॅस्ट्रोसिटी आणि विनयभंगाची तक्रार आहे. आता अॅस्ट्रोसिटीची तक्रार असेल तर ती नोंद करून घ्यावी लागते. त्यावर मी त्यांना कारण विचारलं असता ते म्हणाले की, सकाळी ज्या महिला तुमच्या सत्कारासाठी आल्या होत्या त्याच महिला आता तुमची तक्रार करण्यासाठी आल्या आहेत. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यावेळी मी प्रशिक्षणार्थ होतो. त्या महिलांना माझा सत्कार करायचा होता आणि त्यावेळी स्वतःचे कपडे फाडून घ्यायचे होते आणि विनयभंगाची तक्रार करायची होती, अशी माहिती पोलिसांनी मला दिली."
तुकाराम मुंढे म्हणाले की, "तो माझ्या प्रशिक्षणार्थ काळातील अनुभव होता. या घटनेच्या दिवशी मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणाचीही भेट घेतली नाही. मी शहरासाठी एवढं चांगलं काम करत होतो, तरीही ही वेळ का यावी याचा विचार मी करत होतो. त्यावेळी माझ्यासमोर दोन मार्ग होते. एक म्हणजे आपण जे करतोय ते करत राहणं, किंवा दुसरं म्हणजे तो मार्ग बदलणे."
आपण पब्लिक सर्व्हिसमध्ये का आलोय? नोकरी करायची की लोकांची कामं करायची? असा मी रात्रभर विचार केला. त्यानंतर मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो. आपण जो मार्ग निवडलाय त्याच मार्गावरून चालायचं. त्या मार्गावर अनेक अडचणी येतील, पण तो मार्ग सोडायचा नाही. तेव्हापासून मी त्याच मार्गावर चालतोय, असं मुंढे म्हणाले.
या संकटामध्ये मला माझ्या कुटुंबाने खूप साथ दिली म्हणून मी तग धरून राहिलोय. मात्र ज्यावेळी कारवाईची व्याप्ती मोठी असते त्यावेळी हल्लाही मोठा होतो, सामूहिक प्रयत्न केले जातात. तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापासून ते जीवनातून उठवण्यापर्यंत प्रयत्न केले जातात. अशा अनेक प्रसंगांना मी सामोरं गेलो आहे, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
व्यवस्थेत राहून प्रमाणिक राहत असाल तर अनेक अडचणी येतात. त्यावेळी हे सर्व थांबवावं असा विचार कधी मनात आला आहे का, असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की," आतापर्यंत चार ते पाच वेळा असे प्रसंग आहे. त्या गोष्टींची मला इथे किंवा कुटुंबासोबत चर्चाही करता येत नाही. त्याचा परिणाम भयंकर झाला. कुणाच्याही आयुष्यात प्रसंग येऊ नयेत. त्यावेळी मला कुठेतरी थांबावं असंच वाटत होतं. मात्र महापुरुषांच्या कामापासून प्रेरणा घेत मी पुढे गेलो."
ही बातमी वाचा:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.