भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. टीम इंडियासोबत केलेला करार संपुष्टात आला आहे. टी दिलीप यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा संघाची धुरा सांभाळली होती. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील विजयानंतर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या काळातही बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ तात्पुरता वाढवला. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर त्यांचा करार संपुष्टात आला असून, बीसीसीआयने तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंड आणि इंगिलंड दौऱ्यात भारताचं क्षेत्ररक्षण सुमार झालं होतं. त्यात पराभवामुळे कोचिंग सेटअप बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने टी दिलीप यांचा कार्यकाळ वाढवला नाही.
टी दिलीप यांच्या कार्यकाळात भारताने मोठं यश मिळवलं आहे हे विसरून चालणार नाही. 2024 आणि 2026 टी20 वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर 2023 आणि 2025 आशिया कप जिंकला आहे. टी दिलीप यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने वर्कहॉर्स म्हणजे कष्टाळू खेळाडू असा उल्लेख करत त्याच्या कार्यकाळाची स्तुती केली आहे. इन्स्टाग्रामवर दिलीप यांची प्रशंसा करताना रोहित शर्माने लिहिले, “तुम्ही एक महान व्यक्तिमत्व आहात, दिलीप गुरु. तुम्ही संघात जादू निर्माण केली आहे आणि पडद्यामागे कठोर परिश्रम करणारे खरे ‘वर्कहॉर्स’ आहात. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.”
टी दिलीप यांचा करार संपल्यानंतर आता ही जबाबदारी बीसीसीआयने सुभदीप घोष यांच्या खांद्यावर टाकली आहे. सुभदीप घोष भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणार आहेत. सुभदीप घोष यांनी यापूर्वी भारतीय महिला संघ आणि इंडिया अ संघासोबत काम केलं आहे. आता त्यांचा कार्यकाळ श्रीलंका कसोटी मालिकेपासून सुरू होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.