महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने लातूर येथील ‘श्री नीलकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना’साठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून १८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला ‘स्पेशल केस’ म्हणून मंजुरी दिली आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘सरकारकडे सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, वैद्यकीय सुविधांसाठी निधी नाही. पण भाजप आमदारांना ‘स्पेशल केस’ म्हणून मदत करण्यासाठी यांच्याकडे निधी उपलब्ध आहे. मुख्यमंत्री कार्यालय मुंबईत एका भाजप आमदाराला १६ एकर मोकळी जागा भेट म्हणून देत आहे आणि आपल्या कंत्राटदार मित्राच्या फायद्यासाठी फुटबॉलच्या मैदानावर कब्जा करण्याचे प्रकार घडत आहेत. आता मतदार तुम्हाला ‘स्पेशल केस’ ठरवून लवकरच सत्तेतून बाहेर करतील”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.