गेल्या काही काळापासून पाकिस्तानात अस्थितरता आहे. अशातच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा स्वातंत्र्यांचा नारा बुलंद होत आहे. लवकरच बलुच नेते स्वतंत्र पासपोर्ट आणि चलनही जारी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यंदा मोठ्या प्रमाणात 11 ऑगस्टला स्वतंज्ञ बलुचिस्तान दिवस साजरा झाला. पाकिस्ताननं त्याविरोधात अनेक भागातील वीज आणि इंटरनेट सेवा खंडीत केली होती. मात्र बलोच नेत्यांनी न जुमानता पूर्ण प्रांतात स्वतंत्रता दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. विशेष म्हणजे बलोच नेत्यांनी भारतामधून मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही आभार मानले.




स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता देण्याची मागणी


स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचे बलोच नेते मिर यार बलुच आणि मेहरंग बलोच हे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या आक्रमक भाषणांचे हादरे पाकिस्तानच्या इस्लामाबादपर्यंत पोहोचतात. बलुच नेत्यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता देण्याचं आवाहन केलं. “रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान” च्या वतीने पासपोर्ट, चलन, दूतावास, माध्यमे इत्यादी सुरू करण्याचे दावेही झाले आहे.





बलुचिस्तान सोन्याची अंडी देणारी कोंबडी


बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडीसारखा आहे. पाकिस्तानच्या जमिनीचा 44 टक्के भाग एकटा बलुचिस्तान व्यापतो. मात्र इतक्या मोठ्या भूभागावर फक्त सव्वा कोटी बलोच राहतात. बलुचिस्तानच्या भूगर्भात अनेक ट्रिलियन डॉलरची खनिजं आहेत. तांबं, सोनं, लोखंड, कोळसा, मार्बलच्या असंख्य खदानींनी बलुचिस्तान भरलंय. पाकिस्तानच्या एकूण मार्बल निर्यातीत एकट्या बलुचिस्तानचा वाटा 90 टक्के आहे.




हिवाळ्यात 60 टक्के फळउत्पादनं बलुचिस्तानातूनच होतं, 40 टक्के भाजीपाला बलुचिस्तानातूनच निर्यात केला जातो. बलुचिस्तानातूनच 90 टक्के द्राक्षं-खजूरचा पुरवठा होता. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक वाटा उचलूनही बलोची लोकांच्या वाट्याला फक्त उपेक्षाच आली. वरुन पाकिस्तानी सैन्यानं वर्षानुवर्षे इथल्या महिला-मुलांवर अत्याचार केले. अधिकार मागणाऱ्यांना चिरडलं गेलं. त्याविरोधातच बनलेली बलोच आर्मी सध्या रोज पाकिस्तान सैन्यावर हल्ला करुन स्वातंत्र्यतेच्या घोषणा देतेय.


1948 साली पाकचा बलुचिस्तानवर ताबा


फाळणीवेळी बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नव्हता. 1947 मध्ये बलुचिस्तानवर चार स्वतंत्र संस्थांनांचं राज्य होतं. ज्यात कलात, खारन, लास बेला आणि मकरान यांचा समावेश होता. बलोच संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याकडे कल होता. मात्र जिन्नांनी कट-कारस्थानं करुन काश्मिरप्रमाणेच बलुचिस्तानवर हल्ला केला आणि 1948 साली बलुचिस्तानचा ताबा मिळवला तेव्हापासून आजपर्यंत बलोच लोक स्वतंत्र देशासाठी लढत आले आहेत.


बलुचिस्तानला देशाचा दर्जा मिळणार?


संयुक्त राष्ट्रातून मान्यता मिळवण्याचा मार्ग तूर्तास तरी बलुचिस्तानसाठी अवघड आहे. कारण यूएनमध्ये अनेक टप्पे आणि मतदानातून देशाला मान्यता मिळते. पण इतिहास पाहिला तर स्थानिक संघर्षांनी अशा सर्व आंतरराष्ट्रीय मानकांना न जुमानता नव्या राजवटी आणि नवे देश उभे केले आहेत. चीनपासून स्वतंत्र झालेला तैवान… तैवानला स्वतंत्र ध्वज, सरकार, संविधान आहे… पण चीनच्या दबावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर देश म्हणून मान्यता मिळालेली नाही. ऑल्मिपिक स्पर्धेतही तैवानला “चायनीज ताइपेई” या नावानं खेळावं लागतं. पण आंतरराष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटवली नसली तरी तैवाननं स्वतंत्र देश म्हणून ओळख मिळवली.


हे देश मान्यतेच्या प्रतीक्षेत


अफगाणिस्तानातील तालिबान्यांची अफगाणची सत्ता ताब्यात घेतली असली तरी अद्याप त्यांना मान्यता मिळालेली नाही. पॅलेस्टाईननं 1988 साली स्वतंत्र देशाची घोषणा केली. यूएनमध्ये 138 देशांनी त्याला मान्यताही दिली, पण अजूनही पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रात पूर्ण सदस्यत्व मिळालेलं नाही. 1991 मध्ये सोमालियापासून सोमालीलँड देश वेगळा झाला. अजूनही संयुक्त राष्ट्रानं सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही. पण सोमालीलँडमध्ये स्वतःचं सरकार आणि प्रशासन सुरु आहे. त्यामुळे भविष्यात बलुचिस्तानला स्वातंत्र्याची लढाई सर्व पातळ्यांवर लढावी लागणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.