बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






खड्ड्यांनी हैराण झालेल्या नाशिककरांसाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नाशिक महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, हजारो शिवसैनिक आणि नाशिककर यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोर्चासाठी हजेरी लावली. भगवे झेंडे, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांनी मोर्चाला सुरुवात झाली. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, केंद्रात सत्ता.. राज्यात सत्ता.. मनपात सत्ता.. अजून किती खाणार भत्ता.. असे फलक हातात घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. हा विशाल मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला. सारा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. या मोर्चाचे शेवटी सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. सत्तेत शिवसेना नसली तरी रस्त्यावर शिवसेनेची सत्ता आहे, असे म्हणत खड्डे कधी बुजवणार याची कालमर्यादा द्या अन्यथा तुम्ही आहोत आणि आम्ही आहोत असा खणखणीत इशारा संजय राऊत यांनी दिला.


खड्ड्यातून वाट काढत आपण इथपर्यंत पोहोचलात, खड्डे तुटवत इथपर्यंत आलात. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. सत्तेतील शिवसेनेपेक्षा रस्त्यावरील शिवसेना डेंजर आहे. या रस्त्यावरील शिवसेनेची परीक्षा बघायची असेल, तर तुम्हाला रस्त्यावर यावे लागेल. समोर जर महापौर, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर व्यासपीठावर येऊन नाशिककरांच्यावतीने आमचे निवेदन घ्यायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा मोर्चा निघत आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी जनतेसाठी कर्तव्य भावनेने रस्त्यावर उतरतो. भाजप आणि मिंधे गटाचे नगरसेवक घरात लपून बसले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये खड्ड्यामुळे बळी गेलेल्यांची नावेही वाचून दाखवली आणि हे प्रशासनाने केलेले खून आहेत, अशी टीका केली. एक खून केला तर फाशी होते, यांनी 10-12 खून केले असून जोपर्यंत 302 चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.


दहा-बारा बळी घेता आणि हसत हसत सांगता 5 लाख रुपये दिले. गरीबांच्या जीवाची किंमत 5 लाख रुपये आहे. हे 5 लाख तुमच्याकडेच ठेवा. मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी, जखमींना 50 लाख रुपये द्यायला हवेत. जे जखमी उपचार घेत आहेत त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. ते आयुष्यभरासाठी बेडवर आहेत. त्यांचे बीलच आता 5-10 लाख रुपये झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देताय आणि ठेकेदाराकडून कोट्यवधीचे कमीशन खाताय. डुप्लिकेट वर्क ऑर्डर आणि भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न… यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हे एका एका दिवशी 27 कोटी खात असून आपल्या पोरांचे पळी घड्ड्यात जात आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.








Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.