मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज (शनिवारी) सहावा दिवस आहे. जरांगे पाटलांनी रात्री पाणी आणि सलाईन घेतले असले तरी, त्यांचे उपोषण आजही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर, आज राज्य सरकारचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याची शक्यता आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, मकरंद पाटील आणि प्रसाद लाड हे शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत. काल रात्री आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली होती. मात्र, जरांगे पाटील सातारा आणि कोल्हापूर गॅझेट संदर्भात जीआर काढण्याच्या आपल्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. हैदराबाद गॅझेटचा मुद्दा न्यायालयात प्रविष्ट असल्याने, आता सरकार सातारा आणि कोल्हापूर गॅझेट संदर्भात काय आश्वासन देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या मनोज जरांगे पाटील विश्रांती घेत असून, त्यांच्या हातात सलाईन सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.