गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची तयारी सुरू झाली की उत्साहाला उधाण येतं. तिकीट बूक झालं, बॅगा भरल्या, की ‘गाडी चालली कोकणाला गणपती सणाला’ अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर स्टेटस आणि फोटो शेअर करण्याचीही अनेकांना घाई होते. मात्र आपण मजेसाठी टाकलेली ही पोस्ट घर किती दिवस बंद राहणार आहे, याची माहिती नकळत दरोडेखोरांपर्यंत पोहोचू शकते आणि त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाताना उत्साहासोबत घराच्या सुरक्षेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
या गोष्टी ठेवा लक्षात
1) असे कॅप्शन टाळा
‘गावी निघालो’, ‘मुंबई सोडली’, ‘पुढचे 10 दिवस गावात’ अशा कॅप्शनसह पोस्ट किंवा स्टेटस टाळा. विशेषतः घर रिकामं असल्याची माहिती सार्वजनिकपणे देऊ नका.
2) प्रवासाचे फोटो
गाडी कुठून निघाली, कोणत्या मार्गाने जात आहात किंवा सध्या कुठे पोहोचला आहात, याचे थेट अपडेट देणं टाळा. फोटो परत आल्यानंतर शेअर करणं अधिक सुरक्षित ठरू शकतं.
3) घराच्या चावीबद्दल माहिती
चावी घराबाहेरच्या नेहमीच्या ठिकाणी ठेवत असाल तर त्याची माहिती सोशल मीडियावर किंवा अनोळखी व्यक्तींना देऊ नका.
4) घर बंद करण्यापूर्वी…
सर्व दरवाजे, खिडक्या आणि बाल्कनीचे दरवाजे व्यवस्थित लॉक आहेत का, हे निघण्यापूर्वी तपासा.
5) मौल्यवान वस्तू
दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे किंवा इतर मौल्यवान वस्तू घरात सहज दिसतील अशा ठिकाणी ठेवू नका.
6) विश्वासू व्यक्तीला माहिती द्या
काही दिवस घर बंद राहणार असल्यास कुटुंबातील विश्वासू व्यक्ती, शेजारी किंवा सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना माहिती देऊ शकता. गरज पडल्यास ते घराकडे लक्ष ठेवू शकतील.
गणपतीच्या उत्साहात सोशल मीडियावर प्रत्येक क्षण शेअर करण्याचा मोह होतोच. मात्र तुम्ही कुठे आहात यापेक्षा तुम्ही घरात नाही आहात, ही माहिती सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जाताना उत्सवाचा आनंद घ्या, पण घराच्या सुरक्षेची माहिती सोशल मीडियापासून दूर ठेवा.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.